नऊ फेब्रुवारीच्या मकर षट्ग्रहीचा परिणाम साधारणपणे ३० मार्चपर्यंत असू शकतो. मकर राशीत रवी, शनी, गुरू, बुध, शुक्र आणि चंद्र एकत्र येत आहेत. मकर रास कालपुरुषाच्या कुंडलीत दशम (कर्म) स्थानी येते आहे. त्यामुळे एकंदरीत व्यवहारिक पातळीवर कोणत्याही कारणाने उद्योगधंदे, व्यापार यावर थोडा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. युद्धजन्य परिस्थिती, देशांतर्गत प्रचंड प्रमाणात क्रांतिसदृश परिस्थिती, बंडाळी, यादवी युद्ध वगैरेंचा त्रास शासनास होऊ शकतो. मंगळ मेषेत केंद्र योगात असल्याने गृहमंत्रालयावर ताण, शासकीय यंत्रणांवर ताण आणि पोलिस, सैनिक यांच्याकडून बळाचा वापर १०० टक्के संभवनीय आहे. नऊ फेब्रुवारीपासून करोनाचा त्रास कदाचित वाढू शकतो. संबंधितांनी काळजी घ्यावी.
या प्रेडिक्शनला मेदनीय ज्योतिष (Universal Astrological predictions) म्हणतात. याचा वैयक्तिक ज्योतिषशास्त्राशी संबंध नाही. त्यामुळे हे केवळ एकाच राशीला लागू पडते असे नसून सबंध विश्वावर याचा कमी-अधिक परिणाम होणार आहे, हे नक्की. यातील शेवटच्या ओळीत ‘संबंधितांनी’ लिहिले आहे, याचा अर्थ ज्यांना करोना संसर्गाचा धोका आहे अशा व्यक्तींनी, ज्यांनी लस टोचून घेतली नाही आणि जी मंडळी अत्यंत निष्काळजी आहेत अशांनी, असे मला म्हणायचे आहे.
सर्व राशींचे ॲथलीट, व्यायामपटू, खेळाडू आणि ज्यांना पायाची दुखणी, गुडघेविकार, युरिक ॲसिडचा त्रास व संधिवात आहे अशांनी मार्च एंडपर्यंत जपावे. व्यायाम करताना अपघात, दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यावी. सकारात्मक विचार करावेत. भांडणे टाळावीत. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मारुती स्तोत्र रोज किमान एकदा, पण शक्यतो संध्याकाळी हातपाय धुवून वाचावे. मांसाहार वगैरे बंधन नाही. (हे सर्व राशींच्या लोकांसाठी ॲप्लिकेबल आहे.)
इथेही केवळ मकर राशीची माणसे असा अर्थ नसून, सर्व राशींची माणसे जी या आजाराने त्रस्त आहेत अशी माणसे (स्त्री-पुरुष आणि तृतीयपंथीय) असा अर्थ गृहीत धरावा. ज्या माणसांना वरील आजारांचा ऑलरेडी त्रास आहे किंवा नुकताच सुरू झाला आहे, अशा प्रत्येक राशीच्या माणसांनी जपावे. त्यातही मकर, सिंह आणि मिथुन मंडळींनी तब्येतीची विशेष काळजी घ्यावी.
शाळा, कॉलेजेस आणि लोकांचे सामूहिक एकत्रीकरण जिथे होते अशा सर्व संस्था, वाहतूक व्यवस्था या घाईघाईने सुरू करण्याचा निर्णय माझ्या मते लवकरच एक मोठी घोडचूक ठरण्याची दाट शक्यता आहे, असे माझे इंट्यूशन म्हणते आहे. मी काही ब्रह्मदेव नाही. त्यामुळे हा माझा अंदाज चुकला तर मला अतिशय आनंदच होईल; पण ज्यांना करोना संसर्गाची भिती वाटते अशांनी नऊ फेब्रुवारीपासून पुढचे दोनेक महिने अतिशय जपावे, विशेष काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझेशन, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग हे नियम कटाक्षाने आणि गांभीर्याने पाळावेत. घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुणे, गुळण्या करणे, वैद्याच्या सल्ल्याने घेत असाल तर काढा किंवा तत्सम सुरक्षित Preventive उपाय करावेत.
अर्थातच हे सर्व राशींचे आबालवृद्ध, स्त्री-पुरुष, तृतीयपंथींसाठी लागू होत आहे. नऊ फेब्रुवारी २०२१ ते ३० मार्च २०२१ या जवळपास दोन महिन्याचा टप्पा हा सर्वच राशींसाठी आरोग्याच्या बाबतीत Precautionary measures घेण्याचा आणि नोकरी-धंद्याच्या बाबतीत सबुरीचे धोरण ठेवण्याचा आहे, हे मी पुनश्च आवर्जून नमूद करतो आहे.
मकर रास ही चर रास असल्याने त्या राशीतील विरुद्ध तत्त्वाच्या ग्रहांचे एकत्रीकरण हे प्रामुख्याने disease relapse चे द्योतक असल्याने ज्यांना (सर्व बारा राशींतील सर्व जण) करोना संसर्ग होऊन गेलाय, जे बरे झाले आहेत अशांनी तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आजार उलटणार नाही किंवा त्याचा पुन:संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. तुमचे डॉक्टर किंवा फिजिशिअन यांनी तुम्हाला दिलेली ट्रीटमेंट न चुकता सुरू ठेवावी, हयगय करू नये ही नम्र विनंती आहे.
संबंधित पोस्ट ही निगेटिव्ह किंवा भयावह नसून, योग्य काळजी व खबरदारी घ्यावी यासाठी लिहिलेली आहे. माझ्या या पोस्टमधील सर्व नकारात्मक किंवा निगेटिव्ह शब्द खोटे ठरोत आणि जगातील प्रत्येकाला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य प्राप्त होवो हीच परमेश्वराकडे अगदी मनापासून प्रार्थना आहे.
- सचिन मधुकर परांजपे (पालघर)